प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल विविध मार्गांनी घाटमाथ्यावर जात असे. उत्तर कोकणातील शूर्पारक म्हणजेच नालासोपारा, कल्याण इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाटवाटांनी जुन्नर या घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या मार्गावर नाणेघाट सारखा प्रसिद्ध प्रशस्त घाट आहे. तसेच दाऱ्या घाटा सारखा काहीसा अपरिचित घाट आहे. दाऱ्या घाटाच्या रक्षणासाठी दुर्ग आणि धाकोबा (ढाकोबा) हे दोन किल्ले आहेत. या घाट मार्गाजवळ पळू सोनावळे येथे गणेश गडद ही लेणी आहेत. नाणेघाटा इतका दाऱ्या घाट प्रसिध्द नसला तरी ट्रेकर्स लोकांना तो परिचित आहे दुर्ग – धाकोबा – दाऱ्या घाट असा दोन दिवसाचा ट्रेक करता येतो.
महाराष्ट्राचे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग पडतात. देश आणि कोकण. देश आणि कोकण यांच्यामध्ये सह्याद्रीची मोठी भिंत उभी आहे. त्यामुळे या दोन भौगोलिक विभागादरम्यान व्यापारासाठी किंवा वाहतुकीसाठी ही अजस्त्र भिंत सर्वांनाच पार करावी लागते. हा प्रवास सुखकर आणि आरामदायी होण्यासाठी आपण नवनवे मार्ग बनवले. डोंगर फोडून बोगदे केले, गुळगुळीत रस्तेही साकारले; परंतु हजारो वर्षं आपण मागे गेलो; तर त्याकाळीही देश आणि कोकणाला जोडण्यासाठी घाटवाटांची निर्मिती झाल्याचं दिसतं. निसर्गसंरक्षणाचा नियम पाळून आपल्या पूर्वजांनी या वाटा जपल्या होत्या. विकासाच्या नावाखाली हे घाटरस्ते मोठे करण्यासाठी मानवानं निसर्गाचा ऱ्हास केला. काही वाटांना आजही आधुनिकीकरणाचा स्पर्श झालेला नाही. त्यातलाच निसर्गाचा देखणा अविष्कार दाखविणारा घाट म्हणजे दाऱ्या घाट.